कोलकाता : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेक ठिकाणी हिंसाचार उफाळून आला असून, भाजपाच्या नवनिर्वाचित आमदाराच्या भावाचीच हत्या करण्यात आली. राजधानी कोलकातामधील न्यू टाऊन भागात ५ मे च्या मध्यरात्री ही घटना घडली आहे.
पीयूष कनोडिया म्हणाले की, मी आमदार बनून चार तासही उलटले नाहीत आणि मला माझ्या भावाचा मृतदेह बघावा लागत आहे. मला त्याच्या पार्थिवावर हार अर्पण करावा लागला आहे. मी पोलिसांना सांगितले आहे की, या घटनेसाठी जे जबाबदार आहेत त्यांना अजिबात सोडू नका.
आमदार कनोडिया म्हणाले की, प्रत्येक हत्येचा बदला घेतला जाईल आणि कोणत्याही कार्यकर्त्याचे बलिदान व्यर्थ जाणार नाही.
चार राजकीय कार्यकर्त्यांचा मृत्यू
राज्यात अनेक ठिकाणी राजकीय पक्षांच्या कार्यालयांवर हल्ले आणि जाळपोळ केल्याच्या घटना घडत आहेत. अनेक ठिकाणी तृणमूल काँग्रेस आणि भाजपाचे कार्यकर्ते यांच्या झडपा झाल्या असून, अनेक जखमी झाले आहेत.
न्यू टाऊन भागात एका भाजपा कार्यकर्त्यांचा हाणामारीत मृत्यू झाला, तर बीरभूम जिल्ह्यातील नानूरमध्येही एका तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा वादात मृत्यू झाला. आतापर्यंत पश्चिम बंगालमध्ये चार कार्यकर्त्यांचा वेगवेगळ्या घटनांमध्ये मृत्यू झाला आहे.
संदेशखालीमध्ये पोलिसांवर गोळीबार
संदेशखाली समाजकंटकांनी थेट पोलीस आणि सुरक्षा जवानांनाच लक्ष केले. तृणमूल काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्ते भिडले. पोलीस आणि सुरक्षा जवानांनी त्यांना पागवले. दरम्यान, मध्यरात्री गस्त घातल असलेल्या पोलीस आणि सुरक्षा जवानांच्या पथकावरच हल्ला करण्यात आला. जवानांवर गोळीबार करण्यात आला. पोलिसांनी हातबॉम्ब आणि इतर शस्त्रास्त्रे जप्त केली आहेत.
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने हिंसाचार भडकवणाऱ्या आणि जाळपोळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.